बोरगाव–खरुडे रस्ता खड्ड्यांत हरवला; प्रशासन अन् लोकप्रतिनिधींचे मौन का?
प्रवासी, वाहनचालकांसह गुजरातच्या सप्तशृंगी गडावरील भाविकांचे हाल; रस्त्याच्या दुरवस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप

बोरगाव–खरुडे रस्ता खड्ड्यांत हरवला; प्रशासन अन् लोकप्रतिनिधींचे मौन का?
प्रवासी, वाहनचालकांसह गुजरातच्या सप्तशृंगी गडावरील भाविकांचे हाल; रस्त्याच्या दुरवस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव–खरुडे रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी, दुचाकीस्वार, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहने ये-जा करतात. रस्त्याची अवस्था बिकट झाल्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे गुजरात राज्यातून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून, वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्चही वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते.
रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाला तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
“रस्ता दुरुस्तीसाठी आणखी किती अपघातांची वाट पाहणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.



