विद्यार्थ्यांच्या थाळीत कचरा? जि.प. शाळा मधुरी येथे मिळालेल्या तांदळात दाळ-वनस्पतींचा भरणा!”
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
“विद्यार्थ्यांच्या थाळीत कचरा? जि.प. शाळा मधुरी येथे मिळालेल्या तांदळात दाळ-वनस्पतींचा भरणा!”
सुरगाणा तालुक्यातील जि.प. शाळा मधुरी (केंद्र बार्हे) येथे शालेय पोषण आहारासाठी काल प्राप्त झालेल्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित तांदळामध्ये मसूर डाळ, वाटाणा, अख्खा मूग, सोयाबीन वडे तसेच झाडांची पाने अशा विविध घटकांचा भरणा आढळून आल्याने शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना शिजवून देण्यात येणाऱ्या तांदळाची स्वच्छता व गुणवत्ता तपासताना हा प्रकार उघडकीस आला. तांदळात मोठ्या प्रमाणावर अन्य धान्ये व कचरा मिसळलेला दिसून आल्याने हा तांदूळ साठवणूक किंवा वाहतुकीदरम्यान दूषित झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी तर खाली सांडलेला तांदूळ गोळा करून पोत्यात भरून शाळेला पुरवठा केला असावा, अशी तीव्र शंका उपस्थित केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यात असा हलगर्जीपणा होत असल्यास ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. संबंधित पुरवठादारावर तात्काळ कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



