राज्य शासनाचा क्रांतीकारी निर्णय : शैक्षणिक दस्तऐवजात होणार बदल
बोरगाव : लक्ष्मण बागुल
लेक लाडकी अभियानापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत विविध पावले उचलणाऱ्या महाराष्ट्र शासनाने आता शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे केवळ कागदोपत्री बदल होणार नसून, समाजात मातृशक्तीचा सन्मान वाढवण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे नाव लिहिताना ‘विद्यार्थ्याचे नाव-वडिलांचे नाव-आडनाव’ अशी पद्धत होती. मात्र, नव्या निर्णयानुसार आता ‘विद्यार्थ्याचे नाव-आईचे नाव-वडिलांचे नाव आणि आडनाव’ असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांना हा नियम बंधनकारक असणार आहे.
शाळेत प्रवेश घेताना आता केवळ वडिलांच्या नावावर अवलंबून न राहता, आईचे नाव नोंदवणे अनिवार्य झाले आहे. शाळेचे हजेरी पत्रक (मस्टर), गुणपत्रक (रिझल्ट कार्ड), शाळा सोडल्याचा दाखला (एल.सी.) आणि प्रवेश निर्गम उतारा या सर्व अधिकृत कागदपत्रांवर आता आईच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने दिसेल. विशेष म्हणजे, वर्गात हजेरी घेताना किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख सांगतानाही याच क्रमाने नाव सांगणे आवश्यक असणार आहे.
लिंगसमतेचा नवा अध्याय
या निर्णयामागे केवळ प्रशासकीय बदल नसून एक सामाजिक दृष्टिकोन आहे. ‘आई ही मुलाची पहिली गुरू असते. तिला समाजात आणि अधिकृत दस्तऐवजात योग्य सन्मान मिळावा, ओळख मिळावी आणि लिंगसमतेचा संदेश घराघरात पोहोचावा, या हेतूने राज्य शासनाने हे धोरण आखले आहे. सिंगल पेरेंट किंवा आईकडे राहणाऱ्या पाल्यांच्या बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीही या निर्णयामुळे दूर होण्यास मदत होईल.
शिक्षकांनाही नियम लागू
हा नियम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, शाळा प्रशासनातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाही या बदलाचा स्वीकार करावा लागणार आहे. शैक्षणिक नोंदी करताना किंवा कोणत्याही अधिकृत संवादात विद्यार्थ्याचा उल्लेख करताना आईच्या नावाचा समावेश करणे आता बंधनकारक आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मातृसत्ताक पद्धतीचा आदर राखणारा हा निर्णय राज्याच्या शैक्षणिक इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.