दिंडोरी तालुक्यात मंगळवारी पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू*
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

*दिंडोरी तालुक्यात मंगळवारी पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू*
दिंडोरी तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. तर एकाच गळफास बसल्याने मृत्यू झाला.
पहिली घटना दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीत तर दुसरी घटना निफाड तालुक्यातील एका बंधाऱ्यात घडली. तिसरी घटना गंगा महाळुंगी येथे घडली.
चार दिवसापूर्वीच ६ विद्यार्थ्यांच्या विहीरीत कार पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी तीन घटनांत पाच मुले मृत्यूमुखी पडली.
दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे आंब्याच्या झाडावर झोका खेळताना सूरज हिंमत गायकवाड (१४) या सातवीतील विद्यार्थ्याचा गळफास बसल्याने मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
*मोहाडीतील दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू*
मोहाडी (ता. दिंडोरी) येथील कुटुंब धार्मिक विधीसाठी नवस फेडण्यासाठी खेरवाडी (ता. निफाड) येथील पाझर तलावाशेजारील देवस्थानाजवळ गेले असताना दुपारी दीडच्या सुमारास पाझर तलावाजवळून जाताना मोहाडीच्या दोन शाळकरी मुलांचा खड्डयात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. नवस फेडण्यासाठी मोहाडी येथील फटांगडे व जाधव कुटुंब खेरवाडी येथील पाझर तलावाशेजारील देवाचा नवस फेडण्यासाठी गेले होते. कुटुंब नवस फेडण्याच्या कामात मग्न असताना ओमकार सुनील फटांगडे (१३) व रुद्र गणेश जाधव (१३) हे खेळत असताना कॉर्टर पाझर तलावात पाय घसरून पडले. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्यावर मोहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
*कादवा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू*
तालुक्यातील परमोरी येथील दोन मुले दुपारच्या सुमारास कादवा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असताना त्यांचा कादवा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. समीर रावसाहेब गांगोडे (१४) व यश राहुल पगारे (१२) अशी या मुलांची नावे आहेत.
ही दोन्ही मुले वरखेडा येथील शाळेत शिकत होते. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. दोन्ही मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याबाबत पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे. सध्या उन्हाळा सुरू असुन तालुक्यातील अनेक भागात पाट, नदी किंवा पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी मुले आंघोळीसाठी जात असतात. पालकांनी या घटनेची दखल घेऊन आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून पाण्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.


