कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त सुरगाणा तालुक्यातील देविदास गावित यांना ‘समाज गौरव’ पुरस्कार*
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

*कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त सुरगाणा तालुक्यातील देविदास गावित यांना ‘समाज गौरव’ पुरस्कार*
कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘जय किसान फार्मर्स’ व ‘आमची माती आमची माणसं’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देविदास यशवंत गावित यांना ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सुप्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुरेल गायन सादर करून मान्यवरांचे स्वागत केले, त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच सांस्कृतिक रंग चढला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्धव आहेर (चेअरमन, आनंद ऍग्रो), अर्जुन बोरवणे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ,डॉ. जयराम पुरकर,राष्ट्रीय सेवा प्रमुख (विविध भारती) डॉ. संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ, सदुभाऊ शेळके, आनंद ऍग्रोचे संचालक, रमेश पाटील, ज्येष्ठ उद्योजक, पांडुरंग चव्हाण, मा. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी), ॲड. नितीन ठाकरे, डॉ. संजय जाधव तसेच माजी जि.प. अध्यक्ष नाशिक पंढरीनाथ थोरे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते देविदास यशवंत गावित यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गावित यांनी शेती, सामाजिक कार्य व ग्रामीण विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून पुरस्कारार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः बाऱ्हे परिसरातील शेतकरी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून गावित यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे योगदान प्रेरणादायी
पंजाबराव देशमुख हे देशातील पहिले कृषिमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार, सहकार चळवळीला चालना, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळेच भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली.
राजकीय क्षेत्रात त्यांनी शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले, तर सामाजिक क्षेत्रात शिक्षणसंस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. शेतकरी हा देशाचा कणा आहे, ही भूमिका त्यांनी कायम ठामपणे मांडली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती व एकजुटीच्या बळावर प्रगती साधावी, असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.



