बालविवाह निर्मूलन कार्यक्रमात ९१५ पालकांची प्रतिज्ञा

बालविवाह निर्मूलन कार्यक्रमात ९१५ पालकांची प्रतिज्ञा
शासकीय कन्या आश्रम शाळा, माणी येथे महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन, प्रेरणा संस्था (मुंबई) तसेच आदर्श युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालविवाह विषयावर आधारित नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक प्रणिती तपकिरे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, गुड टच–बॅड टच, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. उपेन्द्र लाड यांनी आजच्या युवा पिढीसमोरील भविष्यातील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक विचारसरणीवर प्रकाश टाकला.
मानसी शिंदे (एटीसी प्रकल्प, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी आपल्या पालकांशी थेट संवाद साधत बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ९१५ पालकांनी ‘बालविवाह करणार नाही’ या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
कार्यक्रमाला डॉ. उपेन्द्र लाड, प्रणिती तपकिरे, मानसी शिंदे, आदर्श युवा मंडळाचे अध्यक्ष वसंत राठोड, मुख्याध्यापक शांताराम थविल, कन्या आश्रम बोरपाडाचे मुख्याध्यापक अमोल जोपळे, विनायक गावडे, रूपाली कहाडोळे, ईश्वर भोये, युवराज महाले, अशोक ठाकरे, रोहिदास पवार, सुनील चौधरी, कौतिक भोये, सुनंदा वाडेकर, अमरिद शेख, कविता पवार, हर्षाली महाले, रोहिदास गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बनकर यांनी केले.बालविवाह निर्मूलनासाठी समाजात जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.



