अभोण्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा फज्जा ग्रामसभा वादळी सरसकट ५० %कर माफीची ग्रामस्थांची मागणी

अभोण्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा फज्जा
ग्रामसभा वादळी
सरसकट ५० %कर माफीची ग्रामस्थांची मागणी
राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले आहेत. या अभियानात निवासी मालमत्ता कराचा सन 2025–26 चा चालू वर्षातील कर एकरकमी भरल्यास, दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीची 50% थकबाकी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने जाहीर केला आहे. याच अनुषंगाने अभोणा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा पार पडली; परंतु ही सभा अपेक्षेप्रमाणे सुरळीत न चालता ती वादळी आणि वादग्रस्त ठरली.
ग्रामसभेच्या सुरूवातीपासूनच करमाफीसंबंधी नियम, अटी व अंमलबजावणी प्रक्रियेवर ग्रामस्थांनी विविध आक्षेप नोंदवले. अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे पूर्वीच्या वसुलीतील अनियमितता, कर आकारणीतील विसंगती आणि नोटिसा देताना झालेल्या त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले.
काही ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून कराचा योग्य हिशोब उपलब्ध न केल्याचा आरोप करत, करमाफी योजनेंतर्गत कोणाचा किती थकबाकी माफ होणार याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली. ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी योजनेच्या तपशीलांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी समाधानकारक माहिती न मिळाल्याचे सांगत जोरदार नाराजी व्यक्त केली.
सभेत काही वेळा दोन्ही बाजूंमध्ये वाद, गोंधळ आणि शाब्दिक चकमकीही झाल्या. त्यामुळे ग्रामसभेचे वातावरण तापले.
अभोण्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ हरिश्चंद्र देसाई, विजय चव्हाण,भरत हिरे, इकबाल शेख, सुनील करवंदे यांनी शासन निर्णय हा जनहितासाठी असला तरी तो पूर्ण लाभदायक नसून शासन यामध्ये लपाछपी करण्याचा प्रयन्त करीत असल्याचे म्हटले आहे.
ग्रामपंचायतीने सादर केलेला करमाफी प्रस्ताव आणि ग्रामस्थांचा संभ्रम यामुळे कोणताही निर्णय याविषयावर होऊ शकला नाही.



